बालगंधर्व हे संगीत रंगभूमीवरील ‘राजहंस’ : सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन
गायक महेश काळे यांना ‘बालगंधर्व’ पुरस्कार
पुणे : बालगंधर्व हे केवळ आडनावाने राजहंस नव्हते, तर त्यांच्या कर्तृत्वाने आणि संगीत रंगभूमीच्या सेवेने ते खऱ्या अर्थाने संगीत रंगभूमीवरील ‘राजहंस’ ठरले, असे मत माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.
बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला जाणारा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार प्रसिद्ध गायक पं. महेश काळे यांना, तर कोहिनूर गंधर्व पुरस्कार सुकृत ताम्हणकर यांना सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर- न्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या हस्ते सोमवारी प्रदान करण्यात आला, त्यावेळी प्रभू बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला कृष्णकुमार गोयल,श्रीधर प्रभू विजयकांत कुलकर्णी, बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रभू म्हणाले, संस्कृती ही एखाद्या नदीच्या प्रवाहासारखी असते. नदी जोपर्यंत प्रवाहित आहे, जोपर्यंत तिचे अस्तित्व आहे तोपर्यंतच ती लोकांच्या स्मरणात राहते. ती नामशेष झाल्यास ती विस्मरणात जाण्याची भिती असते. हेच तत्व संस्कृतीला देखील लागू पडते. ज्यांनी आपली संस्कृती, कला, साहित्य प्रवाही ठेवले आहे अशा व्यक्तींचे स्मरण करणे म्हणजे ती संस्कृतीरूपी नदी प्रवाहित ठेवण्यासारखे आहे.
उदय लळीत म्हणाले, बालगंधर्वांना आमची पिढी पाहू शकली नाही आणि अनुभवू शकली नाही हे आमचे दुर्भाग्य. परिस्थिती नसतानाही आई- वडिल तिकीट काढून नाटक पहायला घेऊन जायचे. नाटक पाहायला घेऊन जाणे यामागे केवळ मुलांचे मनोरंजन व्हावे, हा एकमेव हेतू नसायचा तर या नाटकांच्या माध्यमातून ज्या सामाजिक प्रश्नांना हात घातला जायचा त्या सामाजिक प्रश्नांची जाण व्हावी, हा उद्देश होता. महेश काळे, कृष्णकुमार गोयल, श्रीधर प्रभू, विजयकांत कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सुरेश साखवळकर यांनी प्रास्ताविक केले. अनुराधा राजहंस यांनी सुत्रसंचालन केले. निखिल कुलकर्णी यांनी आभार मानले.
सुरेश प्रभू म्हणाले, ज्यांनी आपली संस्कृती, कला, साहित्य प्रवाही ठेवले आहे, अशा व्यक्तींचे स्मरण करणेही संस्कृतीरूपी नदी प्रवाहित ठेवण्यासारखे आहे. न्यायमूर्ती उदय लळीत म्हणाले, बालगंधर्वांना आमची पिढी पाहू शकली नाही आणि अनुभवू शकली नाही, हे आमचे दुर्भाग्य आहे. बालगंधर्वांनी मराठी माणसांना नाटक पाहण्याचे वेड लावले. नाटक हा सोहळा आहे, तो अनुभवण्याचा विषय आहे.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, पुणेकर नाट्यसंगीतात कुठेही मागे नाहीत. नाट्यसंगीताला राजाश्रय मिळाला पाहिजे. सूत्रसंचालन अनुराधा राजहंस यांनी केले. यावेळी महेश काळे यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
मी धन्य झालो महेश काळे
बालगंधर्वांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्यामुळे मी धन्य झालो आहे. पुरस्कारातील केवळ एक रुपया आशीर्वादरूपी माझ्याकडे ठेवून उर्वरित रक्कम गायन, वादनाची सेवा करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना देणार आहे, असे महेश काळे म्हणाले.